मुंबई : आपण जे इतरांना सांगतो, ते स्वतःही आचरणात आणावे, असे सांगून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अगस्तू फाउंडेशनच्या संस्थापक आणि सीईओ आचरा खान यांनी व्यक्त केले. मानसिक आरोग्याबाबत अनाठायी ताण न घेता, त्यासाठी सहज आणि प्रामाणिक प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पल्स २०२६ परिषदेत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘केअर फॉर केअर प्रोव्हायडर्स – प्रॅक्टिसिंग व्हॉट वी प्रिस्क्राइब’ या सत्रातून स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. या सत्रात अगस्तू फाउंडेशनच्या आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी सहभाग घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपण जे इतरांना सांगतो, ते स्वतःही आचरणात आणणे या संकल्पनेवर विशेष भर देत आचरा खान म्हणाल्या, इतरांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. ‘आयुष्यात काहीही पूर्णपणे बरोबर किंवा चूक नसते. ते फक्त उपयुक्त असते किंवा उपयुक्त नसते’ हा दृष्टीकोन स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला. आरोग्यसेवा देणाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांनी स्वतःची काळजी घेणे ही देखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नुपूर शिखरे यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी कामाच्या ठिकाणी हलके परंतु आवश्यक शारीरिक व्यायाम प्रकार यावेळी प्रात्यक्षिकासह दाखविले.