येरमाळा : प्रसिद्ध येरमाळा यात्रेला यंदा दुर्दैवी घटना घडून गालबोट लागले आहे. यात्रेदरम्यान एका हॉटेलमध्ये पनीर खाल्ल्यानंतर झालेल्या तीव्र फूड पॉयझनिंगमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे यात्रेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली असून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला यात्रेसाठी येरमाळा येथे आली होती. यात्रेतील एका हॉटेलमध्ये तिने पनीरचा पदार्थ खाल्ला. मात्र, काही वेळातच तिला उलट्या, मळमळ आणि तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, पनीरमुळेच तिला गंभीर अन्न विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने संबंधित हॉटेलची चौकशी सुरू केली असून अन्न नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात्रेतील इतर हॉटेल्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यात्रेत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.