मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील दिंडोशी परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादाने हिंसक रूप घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 8 जणांना अटक केली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नगर परिसरात मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान वाद निर्माण झाला. जोरात वाजणाऱ्या संगीतावरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारीत रूपांतर झाले. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेकडून संबंधित आरोपींच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने काही घरं आणि दुकानांवर तोडक कारवाई करण्यात येत आहे. ही बांधकामं बेकायदेशीर असल्याच्या तक्रारीनंतरच ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
घटनेनंतर काही संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कारवाई केवळ दिखावा असल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कारवाईला समर्थन देत दोषींवर योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.