नाशिक : नाशिकमध्ये एका 24 वर्षीय तरुणाचा भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शंतनू जयंत बुऱ्हाडे असे मृत तरुणाचे नाव असून, तो शिक्षणासाठी अमेरिकेत होता. तब्बल दोन वर्षांनंतर तो नुकताच मायदेशी परतला होता. कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच अवघ्या दोन दिवसांतच या दुर्घटनेने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शंतनू शनिवारी दुपारी आपल्या दोन मित्रांसह कारने गंगापूर धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. संध्याकाळी निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर तिघेही रात्री नाशिककडे परतत होते. यावेळी नाशिक-गिरणारे मार्गावरील ‘गंमतजमंत’ हॉटेलजवळील पुलावर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
वेग जास्त असल्याने कार रस्त्यावर उलट्या पालट्या खात पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या भीषण अपघातात शंतनूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे दोन्ही मित्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शंतनू हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कार्यरत आहेत. मुलगा परत आल्याचा आनंद काही तासांतच शोकात बदलल्याने बुऱ्हाडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या पुलावर अलीकडच्या काळात वारंवार अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. अरुंद रस्ता आणि धोकादायक वळणांमुळे हा परिसर अपघातप्रवण ‘ब्लॅकस्पॉट’ ठरत असल्याची चर्चा असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.