पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने “सत्यशोधक विचार आणि एआय च्या जमान्यातील आव्हाने” या विषयावर आयोजित विशेष संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता फाऊंडेशन च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या अखंडाचे सामूहिक गायन करण्यात आले.
या संवादात प्रा. प्रविण चव्हाण ,अभिजित अनाप आणि साथी सुभाष वारे यांनी प्रमुख संवादक म्हणून सहभाग घेतला. उपेंद्र टण्णू यांनी सूत्रसंचालन केले.आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक विचारांची आजची उपयुक्तता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांशी संवाद साधताना वक्त्यांनी विवेकनिष्ठ विचार, अंधश्रद्धा निर्मूलन आणि तंत्रज्ञानाचा सामाजिक भल्यासाठी उपयोग यावर भर दिला."ए आय चा विवेकी वापर व्हावा" असा सूर या संवाद कार्यक्रमात उमटला. अभिजित अनाप म्हणाले,'महात्मा फुले हे कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सबिलिटीचा विचार पहिल्यांदा अमलात आणणारे द्रष्टे आणि काळाच्या पुढे पाहणारे व्यक्तिमत्व होते.एआय च्या जगात वावरताना त्यांच्या सत्यशोधनाच्या भूमिकेचा आग्रह धरला पाहिजे.कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे लोकशाहीकरण झाले पाहिजे.प्रा. प्रविण चव्हाण म्हणाले,'कृत्रिम प्रज्ञेच्या पलीकडे मानवी प्रज्ञा आहे.म्हणून ती वापरून तथ्य आणि सत्याचा शोध घेतला पाहिजे.सुभाष वारे म्हणाले,'कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून असत्य आणि भ्रामक माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आपण विवेकनिष्ठ वापर करून एआय वर स्वार झाले पाहिजे.बहुजनांनी अंगभूत निर्मितीच्या कौशल्यासहीत कृत्रिम प्रज्ञेची आधुनिक कौशल्ये आत्मसात करून संतुलित,समन्यायी मानवी प्रगती साधली पाहिजे.संगणकाला विरोध झाला तसा एआय ला विरोध करणे योग्य ठरणार नाही.
कार्यक्रमाला संदीप बर्वे,महेश तनपुरे,शीतल यशोधरा,विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. संवादानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तरांद्वारे सहभाग घेतला आणि विषयावरील आपले विचार मांडले. आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अशा प्रकारचे विचारप्रवर्तक उपक्रम पुढेही आयोजित करण्यात येतील, असे सांगितले.सामाजिक विचार, विज्ञाननिष्ठता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारा हा संवाद तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला.