कल्याण : कल्याण–मुरबाड-अहिल्यानगर मार्गावरील रायते पुलावर आज सकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. सिमेंट मिक्सर ट्रक आणि काळी-पिवळी इको टॅक्सी यांच्यात झालेल्या जोरदार समोरासमोर धडकेत टॅक्सीतील ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इको टॅक्सी कल्याणहून मुरबाडकडे प्रवासी घेऊन जात होती. रायते पुलावर रस्त्याच्या एका बाजूनेच वाहतूक सुरू असल्याने दोन्ही दिशेची वाहने एकाच लेनमध्ये चालत होती. याचवेळी टॅक्सी चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकला ती जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की टॅक्सी पूर्णपणे चुराडा झाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेत मृतांपैकी ७ जण मुरबाड येथील, १ कल्याणचा, १ साताऱ्याचा असून २ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का, तसेच पुलावर एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी निष्काळजी ओव्हरटेकमुळे अपघात झाल्याचे म्हटले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.ही घटना पुन्हा एकदा बेदरकार वाहनचालना आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी किती जीवघेण्या ठरू शकतात, याची जाणीव करून देणारी ठरली आहे