मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाहीय. बाळासाहेबांनी हिंदुत्वावर शिवसेना उभी केली. संजय राऊत यांनी सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य होत हा क्लब चालवण्याचे काम केले. तुम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत आणि ज्यांनी विचार सोडलेले असतात त्यांना समाजात काहीही किंमत नसते हे जनतेने दाखवून दिले आहे. तुमची विचारशून्यता लक्षात आल्याने उबाठा गटाला घरी बसवण्याचे काम लोकांनी केले. एकाच ठाकरे नावाला किंमत होती ते म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. संजय राऊतांच्या नावाला काहीही किंमत नाही, अशी बोचरी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केली.
वारसा आणि वारसदाराच्या गप्पाही संजय राऊतांनी करू नयेत. कारण संजय राऊत हे सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे वारसदार झाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार राहिलेले नाहीत. सातत्याने शरद पवारांचा उदो उदो करायचा हाच धंदा झाल्याने आपण ठाकरेंचे वारसदार आहोत हे सांगण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. जनतेने तुम्हाला सोनिया गांधी आणि शरद पवारांचे वारसदार ठरवले आहे. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मीठ खायचे आणि सोनिया गांधी, शरद पवारांची चाकरी करायची हा तुमचा धंदा झाल्याचे जनतेने ओळखले असल्याचे श्री. बन यांनी सुनावले.
श्री. बन म्हणाले की, प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन केल्याने संजय राऊतांना लगेच मिरच्या झोंबल्या. तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधी एकही चांगले काम करू शकत नसल्याने त्यांचे अभिनंदन कोणी करणार नाही. प्रियंका चतुर्वेदी निश्चित तुमच्या विरोधात उभ्या राहतील. उबाठा गटात प्रियंका चतुर्वेदी गट आणि आदित्य ठाकरे यांचा गट एकत्र आहे. संजय राऊत, तुम्ही उबाठा गटात एकटे पडलेले आहात हे याच्यावरून लक्षात येते.
श्री. बन पुढे म्हणाले, मतदारसंघाची पुनर्रचना कशी करायची हे निवडणूक आयोग ठरवेल. मतदारसंघ फोडण्याबद्दल संजय राऊत तुम्ही जी भाषा वापरता ती चुकीची आहे., महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने मते न देता तुम्हाला चपराक लगावली. मतदारसंघांची पुनर्रचना आणि जनतेने मत देण्याचे टाळत तुम्हालाच फोडण्याचे काम केले. विधानसभा आरक्षण योग्य पद्धतीने केले जाईल आणि तुम्ही केव्हापासून मतदारसंघाची चिंता करताहात? संजय राऊत, तुम्हाला एकही मतदारसंघ नाही. जे ना कधी लोकसभा, विधानसभा, महापालिकेची निवडणूक लढले त्यांना मतदारसंघाबद्दल चिंता असायचे कारण काय? वॉर्डाच्या निवडणुकीतही जिंकून येऊ शकत नसल्याने मतदारसंघ पुनर्रचनेची चिंता संजय राऊत आणि उबाठा गटानेही करू नये.