नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास वेगाने सुरू असताना संबंधित खातेदारांवरही पोलिसांची चौकशी सुरू आहे. 13 एप्रिल रोजी शिर्डी पोलीस यांनी संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची तब्बल 8 तास चौकशी केली. चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी समता पतसंस्थेत कधीही खाते उघडले नसल्याचा दावा केला, तसेच दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणावर गेल्या 28 दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात अनेकांवर आरोप झाले, मात्र ते पुराव्यांसह मांडले गेले. पण त्यांच्या बाबतीत कोणतेही ठोस पुरावे न देता केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
निनावी पत्रावरून सवाल
रुपाली चाकणकर यांनी निनावी पत्राच्या मुद्द्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. हे पत्र नेमके कोणाकडे आणि कसे पोहोचले, याचा खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. कोणतीही शहानिशा न करता पोलीस प्रशासनाकडे आलेले निनावी पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवून चर्चेला उधाण आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही अशा निनावी पत्रांना कायदेशीर महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही हे पत्र कोणी आणि कोणत्या हेतूने लिहिले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
“आमचा कोणताही संबंध नाही”
चाकणकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, खरात प्रकरणातील कोणत्याही आर्थिक, जमीन किंवा अन्य व्यवहारांशी त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. अफवा, तर्कवितर्क आणि एकतर्फी बातम्यांमुळे मानसिक त्रास होत असल्याचेही त्यांनी म्हटले.तपास यंत्रणेला निष्पक्षपणे काम करता यावे म्हणून आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती, असे सांगत त्यांनी शेवटी सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला.
अशोक खरात पोलीस कोठडीत
दरम्यान, आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तो 18 एप्रिलपर्यंत कोठडीत राहणार आहे. नाशिक सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले असता त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.