बारामती:बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा भावनिक वातावरणात पार पडली. या सभेत बोलताना जय पवार यांनी वडील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावूक केले. “दररोज दौरा संपल्यानंतर दादांचा फोन यायचा—‘काय रे जय, कसा दौरा झाला?’—तो आवाज आता नाही; पण त्यांनी दिलेला संदेश कायम आहे—‘रडायचं नाही, लढायचं’,” असे ते म्हणाले.
जय पवारांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ प्रचार नसून बारामतीच्या कुटुंबाशी संवाद साधण्याची संधी आहे. “पूर्वी दादांसोबत रॅली आणि सभा असायच्या; यावेळी मात्र त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव अधिक तीव्र आहे,” असे त्यांनी नमूद केले.
अजित पवारांनी कधीही जात-पातीत राजकारण केले नाही, सर्वांना सोबत घेऊन काम केले, असे सांगत जय पवारांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. “ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर तीच खरी श्रद्धांजली ठरली असती,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी त्यांनी मतदारांना आवाहन केले. “दादांनी जसं बारामतीवर प्रेम केलं, तसंच प्रेम सुनेत्रा वहिनींनाही द्या. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे,” असे ते म्हणाले.सभेच्या शेवटी जय पवारांनी बारामतीकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत “बारामतीकरांनो, आय लव्ह यू टू,” असे म्हणत आपले भाषण संपवले.