मुंबई: महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच मुंबईत काढण्यात आलेल्या भाजपच्या जनआक्रोश मोर्चात अनपेक्षित घटना घडली. वरळीतील जांबोरी मैदानातून सुरू झालेला मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला. मात्र या मोर्चामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
याच दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “मोर्चा काढायचाच असेल तर तो मैदानात घ्या, रस्त्यावर नागरिकांना अडचण का निर्माण करता?” असा सवाल करत तिने जोरदार नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर उपस्थित पोलिसांनाही तिने प्रश्न विचारत, परिस्थिती नियंत्रणात का आणली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, या घटनेवर विरोधी पक्षांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत, जनतेला त्रास देणाऱ्या अशा मोर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते रोहित पवार यांनी त्या महिलेच्या भूमिकेचं समर्थन करत, तिच्या धाडसाचं कौतुक केलं.सध्या ही घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, सार्वजनिक मोर्चांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.