मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या वातावरण तापले असताना, अभिनेता रितेश देशमुख यांनी याबाबत ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला योग्य ठरवत महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असावी, असे स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) ब्रँड अँबेसिडर म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर बोलताना रितेशने आपल्या बालपणीच्या ST प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. वडील विलासराव देशमुख यांच्यासोबत केलेले प्रवास आणि त्या काळातील अनुभव त्याने शेअर केले.
मराठी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना तो म्हणाला की, “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असणे गरजेचे आहे. आपण इतर राज्यात गेलो तर तिथली भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे इथेही मराठीला प्राधान्य दिले पाहिजे.”
यासोबतच त्यांनी राज्य परिवहन व्यवस्थेत होणाऱ्या बदलांचाही उल्लेख केला. आगामी काळात ST बसमध्ये इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असून, सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.ड्रिंक अँड ड्राईव्हसारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगत त्यांनी नागरिकांना जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले.