पुणे : पुणे शहरातील रेल्वे स्थानकाविषयी नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स्थानकातील समस्या व सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करून आढावा बैठक घेण्यात आली.या आढावा बैठकीत सुरक्षा व्यवस्थेत आढळलेल्या गंभीर त्रुटी, समस्या व असुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
पाहणीदरम्यान स्थानकात अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग स्वच्छतागृहातील दुरावस्था यांसह भिकाऱ्यांचे कायमस्वरूपी वास्तव्य, बेघर फिरस्त्यांचे वास्तव्य, प्रवास नियोजित नसतानाही रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्यांची संख्या, रेल्वे स्थानक परिसरात व्यसनाधीन व्यक्तींची वर्दळ, दारू व अमली पदार्थांचे सेवन, चोरी व अत्याचार यांसारख्या घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना नसणे, सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी प्रभावीपणे राबवली जात नसणे, स्थानकावर तिकीट तपासणी करणारे अधिकारी (टीसी) अपुरे असणे इत्यादी मध्ये लक्षात आले. याशिवाय, स्थानकावरील स्टॉल वाटप प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.तसेच पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करण्याचे आदेश देण्यात आले.
या सर्व विषयांच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री मा श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे. भारतीय रेल्वे खाते हे लोकांना सुरक्षित व अद्ययावत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असूनही स्थानिक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे या गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात केंद्रीय पातळीवर संपर्क करून उपाययोजना करण्याची मागणी करणार आहे.
यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) राजेश कुमार वर्मा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) उत्तम जाधव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (Sr. DCM) अनिल कुमार पाठक, स्टेशन डायरेक्टर नरेंद्र ढवळे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा, RPF इन्स्पेक्टर सुनील यादव, लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पुणे स्टेशन) प्रमोद खोपीकर तसेच रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.