नवी दिल्ली : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना, देशात इंधनटंचाई निर्माण होणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचं स्पष्टीकरण देत भारतात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थितीवर आंतर-मंत्रालयीन गटाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी भारताकडे पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. सरकारच्या माहितीनुसार, देशाकडे सुमारे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायू साठा आणि 45 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे.
सरकारने सांगितले की, जागतिक संघर्ष आणि पुरवठा साखळीवरील दबाव असूनही भारताने परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. अनेक देशांनी इंधन वापरावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली असताना, भारतात कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. तसेच देशाचा परकीय चलन साठाही समाधानकारक पातळीवर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश असून 150 हून अधिक देशांना पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करतो. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा आर्थिक परिणाम भारतावरही होत असल्याचं सरकारने मान्य केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा वापर गरजेनुसार करण्याचं आवाहन केलं आहे. मेट्रो सेवा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या पर्यायांचा स्वीकार करावा, असंही त्यांनी म्हटलं.जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतात पेट्रोलियम दर तुलनेने स्थिर ठेवण्यात यश आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.