पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ब्रह्मसिंह गुरुकुलच्या मुलींनी प्रेरणादायी आणि साहसी असा अनोखा उपक्रम राबवत मध्यरात्री अनवाणी मशाल दौड आणि ५० किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले. या उपक्रमातून मुलींनी धैर्य, शिस्त, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
१३ मे रोजी रात्री ९ वाजता मोरेवस्ती येथून या विशेष मशाल दौडीला सुरुवात झाली. मुलींनी सायकलस्वारी करत डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत प्रवास केला. पहाटे १ वाजता येथे ज्योत प्रज्वलित करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदु मराठा संघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष भुषण वरपे यांनी सहभागी मुलींचा महाराजांच्या फोटो फ्रेम देऊन सत्कार केला.
यानंतर पहाटे १:३० वाजता मशाल दौडीची सुरुवात झाली. एका मुलीने हातात मशाल घेत अनवाणी धाव घेतली, तर इतर मुली सायकलवर तिच्यासोबत होत्या. या दौडीतील पहिले मानस्थान मोशी येथील हिंदुभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक होते. येथे मानवंदना अर्पण करण्यात आली. त्यानंतर बर्ड व्हॅली येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले.
संपूर्ण ५० किलोमीटरचा हा सायकलिंग आणि अनवाणी मशाल दौडीचा उपक्रम अखेर गुरुकुलात पूर्ण झाला. या उपक्रमाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमात श्रीशा ओरिवकर, अवंती पांडे, द्रुती सोनावणे, देवश्री बगदलवार, आरोही बनसोडे, रेवा आव्हाड, ध्रुवीता चव्हाण, दीप्ती पाटील आणि श्वेता लिमन या मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी प्रफुल्ल प्रधान यांनी प्रशिक्षण दिले.
“मुली फक्त स्वप्न पाहत नाहीत, तर इतिहास घडवण्याची ताकदही ठेवतात,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.