पुणे : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्य, विद्वत्ता आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करणारा ऐतिहासिक क्षण आज पुण्यात अनुभवायला मिळाला. पुणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘बुधभूषण’ ग्रंथ लेखन करतानाच्या भव्य कांस्यशिल्पाचे अनावरण छत्रपती संभाजी उद्यान येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख उपस्थित होत्या.
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ रणांगणातील पराक्रमी योद्धे नव्हते, तर संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि ‘बुधभूषण’ सारखा ग्रंथ लिहिणारे विद्वान राजे होते. त्यांच्या साहित्यिक, वैचारिक आणि स्वराज्यनिष्ठ वारशाचे स्मरण करून देणारे हे कांस्यशिल्प भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे धगधगते चारित्र्य, अतुलनीय शौर्य आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण समाजाला कायम प्रेरणा देत राहील, असे सांगितले. पुणेकरांसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.