नागपूर : नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जलक्रांती परिषदेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना ‘नटसम्राट’मधील भूमिकेचा उल्लेख करत भावनिक अनुभव शेअर केला. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह पाणी संवर्धन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, ‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका साकारणं अत्यंत आव्हानात्मक आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना कलाकाराला प्रत्येक प्रयोगात पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं लागतं. त्यामुळेच आपण रंगभूमीवर हे नाटक करण्यास नकार दिला आणि केवळ चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
“नाटकाचे सतत प्रयोग करताना प्रत्येक वेळी जीव ओतावा लागतो. मला वाटतं, मी नाटकात काम केलं असतं तर काही प्रयोगांनंतरच कदाचित मेलो असतो,” असं स्पष्ट वक्तव्य नानांनी केलं. त्यांनी पुढे सांगितलं की, डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांनी ‘नटसम्राट’मध्ये काम करताना आपल्या अभिनयात प्राण ओतले.
या भूमिकेचा कलाकाराच्या मन आणि शरीरावर मोठा ताण येतो, असंही नानांनी नमूद केलं. तसेच, ‘नटसम्राट’ चित्रपटात सहकलाकार असलेले दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या अभिनयाचंही त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. “अभिनयाच्या बाबतीत विक्रम गोखले माझ्यापेक्षा कितीतरी सरस होते,” असं नाना म्हणाले.
यावेळी त्यांनी रंगभूमीवरील अनुभव आठवत ‘पुरुष’ नाटकाचाही उल्लेख केला. “मध्यांतरानंतर पडदा लागला तरी प्रेक्षकांच्या खुर्च्यांचाही आवाज यायचा नाही. अभिनयाचा प्रभाव इतका जबरदस्त असायचा,” असं सांगत त्यांनी अभिनयातून मिळणाऱ्या समाधानाची तुलना ‘नाम फाउंडेशन’च्या कामातून मिळणाऱ्या आनंदाशी केली.