मुंबई : तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘देऊळ बंद 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाचा ग्रँड रिलीज होणार असून, पहिल्या भागाप्रमाणे यंदाही चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या भागात कथानक अधिक गंभीर आणि सामाजिक वास्तवाशी जोडलेले असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे एका महिला शेतकऱ्याची संघर्षमय कथा केंद्रस्थानी असून, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण समस्यांवर ती थेट देवाला प्रश्न विचारताना दाखवली जाणार आहे.
दरम्यान, चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांबाबतही चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकणार असून, पहिल्या भागात राघव शास्त्रीची भूमिका गाजवलेला अभिनेता गश्मीर महाजनी या भागातही दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये मोहन जोशी आणि गश्मीर महाजनी यांची भेट दाखवण्यात आली असून, दोघांमधील संवाद लक्षवेधी ठरतो. “तू चित्रपटात आहेस का नाही?” या प्रश्नावर गश्मीर महाजनी “स्वामींची इच्छा असेल तर मी नक्की येईन,” असे उत्तर देताना दिसतो. यावर तो “जशी स्वामींची इच्छा” असे म्हणत भावनिक प्रतिक्रिया देतो.
या संवादामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा गश्मीर महाजनीच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे ही शेतकरी महिलेची प्रमुख भूमिका साकारत असून, ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि व्यवस्थेविरुद्धचा आवाज या कथेत ठळकपणे मांडला जाणार आहे.