मुंबई : राज्यातील कृषि क्षेत्राच्या डिजिटलायझेशनसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतक-यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती संबधित सर्व यंत्रणांनी दूर कराव्यात, असे निर्देश कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
विधानसभा सदस्य विजयसिंह पंडीत यांनी शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमधील तांत्रिक विसंगती दूर करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती यासंदर्भात बैठकीत कृषि मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, सचिव परिमल सिंह, व्हिृसीव्दारे कृषि आयुक्त सूरज मांढरे,ॲग्रीस्टॅकचे संचालक अंकुश माने, उपसचिव श्रीकांत आंडगे, यासह बीड जिल्ह्यातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कृषि मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदार संघातील फार्मर आयडी संदर्भातील त्रुटींवर तातडीने संबधित सर्व कार्यान्वयिन यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. शेतकऱ्यांच्या ८ अ उताऱ्यावरील क्षेत्राची नोंद फार्मर आयडीवर घ्यावी. मोबाईल नंबर जर चुकीचा असल्यास त्यात दुरूस्ती करावी.ज्या शेतक-यांच्या नावावर जमीन आहे त्याचेच क्षेत्र नोंद करावी. या तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा.या अडचणी सोडविण्यासाठी विशेष कॅम्पचे सर्व विभागांच्या समन्वयातून शिबीर आयोजित करून प्रश्न सोडवावा असे निर्देश त्यांनी दिले.