रायगड/पोलादपूर: रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यानच्या घाट मार्गावर एका स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील आसगाव येथील काही तरुण स्कॉर्पिओमधून प्रवास करत असताना घाटातील एका अत्यंत तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर गाडी थेट सुमारे 1000 ते 1500 फूट खोल दरीत कोसळली.
स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत काही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अपघातस्थळी सुरक्षेसाठी योग्य कठडे नसल्याचा मुद्दा समोर आला असून, केवळ मातीचा ढीग असल्यामुळे वाहन थेट दरीत कोसळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये सातारा जिल्ह्यातील तरुणांचा समावेश असून एक व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून पोलीस आणि बचाव पथके समन्वयाने कार्यरत आहेत.अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, अंधार, घाटातील धोकादायक वळणे आणि वाहनाचा वेग हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.