मुंबई : पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर एकूण ६५ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम जिल्हाधिकारी, पालघर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित प्रशासकीय आदेशही जारी करण्यात आले आहेत.
१८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान डहाणू तालुक्यातील धानिवरी परिसरात टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला होता. अपघात इतका गंभीर होता की टेम्पोचा पूर्ण चुराडा झाला. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यास तातडीने मंजुरी दिली. या प्रकरणी मृतांच्या वारसांची पडताळणी करून मंजूर मदत तातडीने वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनास निर्देश देण्यात आले आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुढील नागरिकांचा समावेश आहे :
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सुरेश रत्ना लाखात (वय ४७), पांडू गणपत लाखात (वय ४५), कलु गोविंद लाखात (४८), सुनील अर्जुन दांडेकर (वय ३५), चिमा गोविंद कुऱ्हाडा (वय ७५), नमिता विठठ्ल दांडेकर (वय १४), सारीका संतोष लाखात (वय ३८), आयुष्य सिताराम लाखात (वय १६), सागर नामदेव शेंडे (वय १५), वसंत शिवराम वळवी (वय ४०), सलोनी शिवराम वळवी (वय १२), अजय चंदर आहाडी (वय १९) आणि रियांशी संतोष लाखात (वय ४) सर्व राहणार बापूगाव यांचा समावेश आहे.
अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत वाटपाची प्रक्रिया जलद केली आहे. तसेच इतर आवश्यक प्रशासकीय कामेही प्राधान्याने पूर्ण केली जात असल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.