जळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे आयोजित व्याख्यान सोहळ्यात राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई विश्राम कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधत सावरकरांच्या राष्ट्रविचारांना अभिवादन केले. ‘स्वातंत्र्यप्रेमी’ आणि ‘बहुभाषिक ब्राह्मण संघ, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून समर्थ आणि स्वाभिमानी भारताच्या निर्मितीसाठी आजही मार्गदर्शक आहेत. राष्ट्रासाठी आवश्यक ती भूमिका योग्य वेळी जनतेने घेतली नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. सावरकरांचे विचार हे फक्त ऐकण्याची नव्हे तर कृतीत उतरवण्याची गोष्ट आहे.”
अंदमानातील अमानुष छळ सहन करूनही सावरकरांच्या मनातील देशभक्तीची ज्योत कधीही विझली नाही. त्यांचे क्रांतीकार्य आणि विज्ञाननिष्ठ विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर तसेच ज्येष्ठ सावरकर अभ्यासक ॲड. सुशील अत्रे यांनीही अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर जळगावचे आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष ओम त्रिवेदी, नितीन पारगावकर, सपान झुंझुनूवाला, राजेश नाईक, सुरेंद्र मिश्रा, संजय व्यास, रेखा त्रिवेदी, आकाश त्रिवेदी यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करत डॉ. कुलकर्णी यांनी जळगावकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले.
