पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीची विषारी दारू प्राशन केल्यामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील 8 आणि हडपसर परिसरातील 5 नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरणही तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरून रोहित पवार यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. हडपसर परिसरात पीडित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह संबंधित दारू विक्रीच्या अड्ड्याकडे मोर्चा वळवला.यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या काऊंटरची तोडफोड केली तसेच काही भागांचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रोहित पवार यांनी प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर तीव्र टीका केली.
त्यांनी आरोप केला की, “प्रशासन योग्य प्रकारे कारवाई करत नाही, तसेच काही प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे तपासावर परिणाम होतो,” असा संशयही व्यक्त केला. तसेच, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.