नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या परिसरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. या कारवाईदरम्यान 37 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
डीडीएमए दक्षिण जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच सर्व संबंधित यंत्रणांना तत्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात हॉटेलच्या परिसरातूनच आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आग वेगाने पसरल्याने इमारतीतील अनेक लोक अडकले होते. बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाल्यानंतर काहींनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनी आणि खिडक्यांमधून उड्या मारल्या. स्थानिक नागरिकांनीही जमिनीवर गाद्या टाकून मदतकार्य केले.
दरम्यान, या घटनेनंतर निवासी भागांमध्ये सुरू असलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या परवानग्यांची तसेच अग्निसुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.