पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संगीता जगताप, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावरील भाषणे, कविता तसेच शिवकालीन लाठी-काठी कलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. गायत्री कोळेकर हिने शिवाजी महाराजांच्या विचारांचा आजच्या तरुणांनी स्वीकार करण्याची आवश्यकता आपल्या मनोगतातून व्यक्त केली. वैष्णवी मोरे हिने शिवचरित्रावर आधारित कविता सादर केली, तर साक्षी मराठे हिने जोशपूर्ण ‘शिवगर्जना’ सादर करून वातावरण भारावून टाकले. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.
इतिहास विभागप्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे हिंदवी स्वराज्याला मिळालेली वैधता आणि त्याचे सामाजिक-राजकीय परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
प्राचार्या प्रा. डॉ. संगीता जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थी वैभव सोलंकी व चि. कौशल कुंजीर यांनी शिवकालीन लाठी-काठी कलेचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करत राष्ट्रसेवा व समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. नागेश भंडारी यांनी केले. या प्रसंगी डॉ. रमाकांत कसपटे, डॉ. ज्ञानेश्वर जांभूळकर, प्रा. महेश खरात, प्रा. अक्षय कामठे, डॉ. सुनील वाघ, प्रा. प्रवीण खाडे, प्रा. मीनल जंगले, प्रा. रेणुका अलापुरकर, श्री. सुनील जगताप, श्री. रवी लाड, सौ. वैशाली धुमाळ, सौ. नीलम जगताप, सौ. जयश्री सोरटे, सौ. स्मिता गायकवाड तसेच आरती कांबळे व उदयन गायकवाड आदी उपस्थित होते.प्राचार्या प्रा. डॉ. संगीता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागातील प्रा. अक्षय कामठे व विभागप्रमुख डॉ. जितेंद्र वडशिंगकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.