पुणे : भाजपसाठी परवा ' काळा दिवस' होता आणि आज पुणे नागपुरात खलिस्तानवाद्यांच्या धमक्या हा सर्व योगायोग आहे का? पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फुटीरतावादाला भाजप कडून हवा दिली जाते आहे का?
परवा पंजाब मध्ये महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून जातात. तिथे ऑपरेशन ब्लू स्टार चा दिवस हा ' काळा दिवस' म्हणून उल्लेख करतात आणि या लष्कराच्या कारवाईला मात्र ' आक्रमण' असे संबोधतात. या मंचावर खलिस्तानवादी भिंद्रनवाले यांचेही फोटो असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईत बळी पडलेल्यांना ' शहीद' म्हणून गिरीश महाजन संबोधत होते.हे देशासाठी अत्यंत धोकादायक आणि गंभीर आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुण वैद्य यांना पंजाबच्या धरतीसाठी स्वतःचा जीव गमवावा लागला तर दुसरीकडे महाराष्ट्र व पंजाब मध्ये संत नामदेव यांनी अध्यात्मिक नाते निर्माण केले. असे असताना केवळ सत्तेच्या हव्यासापोटी भाजप मधील या नेत्यांच्या भूमिकेतील घुमजाव हा खेदकारक, गंभीर आहे
आता यानंतर दोनच दिवसात पुणे नागपूरला महानगरपालिका उडवून लावू अशा पद्धतीचा ई-मेल खलिस्तानवादी करतात. हा सर्व योगायोग आहे का? पंजाब मध्ये संवेदनशील विषयाबाबतीत ही अशी बेजबाबदार विधाने जाणीवपूर्वक केली जात आहेत. पंजाबमधील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ सत्ता मिळवण्यासाठी तिथे हिंदू- शीख असा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करते आहे.
खरे तर पंजाब मध्ये बीजेपी चे केवळ दोन आमदार असून मध्यंतरी झालेल्या स्थानिक निवडणुकीमध्ये भाजप पाचव्या स्थानावर फेकले गेले होते असे असताना कामावरच्या राजकारणाऐवजी ध्रुवीकरणाचे राजकारण करण्याचा भाजप चा प्रयत्न आहे. इडी सीबीआयच्या मदतीने तेथील हिंदू व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा, निधी उकळण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहेत.