मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. प्रभावित क्षेत्रांमधील मदत आणि बचाव कार्याबद्दल तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी विस्तृत माहिती घेतली. केंद्र सरकार महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्यासंदर्भात सातत्याने राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असे शाह यांनी सांगितले. बाधित नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा निकट समन्वय राखून काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नेहमीच राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्व आवश्यक संसाधने, तांत्रिक सहाय्य आणि इतर सर्व मदत करेल, असे ते म्हणाले. बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव कार्याचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.