कोल्हापूर : कोल्हापुरात मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या माधुरी हत्ती प्रकरणात अखेर कोल्हापुरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुजरातमधील वनतारा व्यवस्थापनाने स्पष्ट शब्दांत माफी मागत हे मान्य केले आहे की, माधुरी हत्तिणीच्या स्थलांतरासंदर्भात त्यांनी केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले होते आणि तिच्या स्वकीयांपासून तिला दूर करण्याचा त्यांचा कोणताच हेतू नव्हता.
वनताराची भूमिका आणि माफी
वनताराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की – “जर या प्रक्रियेमुळे कोल्हापूर वासीयांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल आम्ही क्षमायाचक आहोत.” तसेच, त्यांनी पुढील पाऊल उचलताना सांगितले की, “राज्य सरकार आणि नांदणी मठ यांच्या सहकार्याने आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथेच माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास योगदान देऊ.”


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
या प्रकरणावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सक्रियपणे लक्ष घातले. त्यांनी मुंबईत वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी माध्यमांना सांगितले की –
“माधुरी हत्तीला परत नांदणी मठाकडे सुखरूप नेण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार आहे आणि त्या याचिकेत सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला खात्रीपूर्वक सांगितले आहे.”तसेच वनताराने हेही स्पष्ट केले की, “आम्ही केवळ न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले होते. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा किंवा तिचा कायमस्वरूपी ताबा घेण्याचा कुठलाही प्रयत्न आम्ही केला नाही.”

नांदणी येथे उभारले जाणारे पुनर्वसन केंद्र कसे असेल?
हे केंद्र समाजाच्या सहभागातून, मानवी दृष्टीकोनातून उभारले जाणार असून यामध्ये खालील अत्याधुनिक सुविधा असतील:
• सांधे व स्नायूंच्या उपचारासाठी हायड्रोथेरपी तलाव
• मोकळ्या हालचालीसाठी नैसर्गिक जलाशय
• लेझर थेरपी व फिजिओथेरपीसाठी स्वतंत्र युनिट
• साखळ्यांशिवाय मोकळे निवास व संरक्षित आश्रय
• आरामासाठी व समृद्धीसाठी वाळूचे खड्डे आणि रबराइज्ड फ्लोअरिंग
• २४x७ पशुवैद्यकीय सेवा
• उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनात उभारणी
• नांदणी मठाच्या सल्ल्यानुसार संपूर्ण रचना

वनताराचा महत्त्वपूर्ण खुलासा
वनताराने यावेळी एक अत्यंत महत्वाची बाब स्पष्ट केली आहे – “हे केंद्र उभारण्यामागे आमचा उद्देश कोणताही ब्रँडिंग, प्रसिद्धी किंवा श्रेय घेण्याचा नाही. या उपक्रमाला अंतिम मान्यता समुदाय आणि न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल. आम्ही केवळ एक सहायक भूमिका निभावू.”या संपूर्ण घडामोडीमुळे कोल्हापुरकरांची भावना, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांना न्याय मिळाला आहे. माधुरी हत्तीचे कोल्हापुरातच पुनर्वसन होणार असून वनतारा, राज्य सरकार आणि नांदणी मठ यांच्या सहकार्याने एक सकारात्मक आणि मानवी पायाभूत पर्याय उभा राहणार आहे.ही घटना केवळ एका हत्तीच्या पुनर्वसनाची नव्हे, तर समाजाच्या एकजुटीच्या आणि पर्यावरणप्रेमाच्या विजयाची आहे.