पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी पुण्यात दाखल झाले आहेत. आळंदीतील पूरस्थितीमुळे पुणे महापालिकेने १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली असली, तरी अनेक ठिकाणी खोल्या अपुऱ्या पडत आहेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता, शाळांच्या छतांना गळती आणि वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी वारकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे अनेकांना रस्त्याच्या कडेला राहुट्या उभारून मुसळधार पावसात मुक्काम करावा लागत आहे.
दरम्यान, हिंगोलीतील अनेक दिंड्यांचे ट्रक आळंदीत पाण्याखाली गेल्याने महिनाभराचे अन्नधान्य, गॅस सिलेंडर आणि स्वयंपाकाचे साहित्य खराब झाले आहे. त्यामुळे शेकडो वारकरी अडचणीत सापडले असून प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सध्या २७,२०३ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूरग्रस्त आळंदीतील परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून पाणीपुरवठा व्यवस्था, शौचालये, पथदिवे, रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, यामुळे वारकरी आणि पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.