पॅरिस : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे. नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो फाऊल गेले पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये ८९ मी चा टप्पा गाठला आणि अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे. तर तिसरा क्रमांक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरसह मिळवला.
नीरजने घडवला इतिहास, ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
नीरजने यंदाच्या मोसमातील ८९.४५ हा सर्वाेत्कृष्ट थ्रो केला आहे. या सर्वाेत्कृष्ट थ्रोसह त्याने रौप्यपदकासह त्याचं दुसरं ऑलिम्पिक पदक मिळवलं आहे. पहिल्या प्रयत्नात नीरज चोप्राने फाऊल थ्रो केला. त्यामुळे त्याचा थ्रो काऊंट केला गेला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भाला फेकत दमदार कमबॅक केलं. मात्र नीरजने थ्रो करण्यापूर्वी पाकिस्तानच्या अरशद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकून इतिहास रचला. हा ऑलिम्पिक इतिहासातील सर्वश्रेष्ठ थ्रो ठरला होता. सुरवातीच्या ३ प्रयत्नात ८९.४५ मीटर हा नीरजचा सर्वोत्तम थ्रो ठरला.नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले असते, तर ऑलिम्पिक इतिहासात जेतेपद राखणारा तो पाचवा भालाफेकपटू ठरला असता. मात्र दोन मीटर अधिक फेक करून त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दोन पदके जिंकणारा चौथा भारतीय
नीरज चोप्रा भलेही सुवर्णपदक जिंकू शकला नसेल, पण असे असतानाही त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारा तो स्वातंत्र्यानंतरचा केवळ चौथा भारतीय खेळाडू ठरला. स्वातंत्र्यानंतर, फक्त बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (एक रौप्य आणि एक कांस्य), कुस्तीपटू सुशील कुमार (एक रौप्य आणि एक कांस्य) आणि नेमबाज मनू भाकेर (दोन कांस्य) यांनी भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत