देहांत निरुपण (भाग १)
प्रारब्धी टाकीला देहो | बोधे फिटला संदेहो | आताचि पडो अथवा राहो | मिथ्या कळीवर ||७/१०/९||
जे असत्य आहे ते सत्य म्हणून भासते आणि जे सत्य आहे त्याचे वेद, पुराण इ. शास्त्राने अनेक पद्धतीने विवेचन केले तरी ते सूक्ष्म असल्याने, त्याचा अनुभव न आल्याने ते असत्य वाटते. हा सगळा मायेचा खेळ आहे. भ्रम आहे. दृश्याच्या प्रभावाने स्वरूप झाकले जाते. खरे समाधान तर स्वरूपाच्या ज्ञानात आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुष देहाचे खोटेपण लक्षात आल्यामुळे देह प्रारब्धावर सोडतो, त्याबाबत उदासीन राहतो. समाधीमध्ये ज्ञानी पुरुषाला स्थूल व सूक्ष्म पंचभूत, पंचतन्मात्रा यामुळे आकाराला येणारा व बदलणारा देह, त्रिगुणांचे देह व मनाच्या स्तरावर सतत होणारे स्पंदन यांचा ऋतंभरा प्रज्ञेमुळे साक्षात्कार होतो आणि क्षणभंगुरतेचा अनुभव येतो. आणि त्याचवेळी सनातन आत्म्याचे दर्शन होते. या स्थिर तत्वाच्या आधारावर सगळी अस्थिरता टिकली आहे हे लक्षात येते. त्यामुळे ज्ञानी पुरुषाला दृश्य देहाविषयी सुखदु:ख राहत नाही. त्याला विकार बाधा बनत नाहीत.
या समासात श्रीसमर्थ सांगतात की असे ज्ञानी योगी जिथे राहतात, तप करतात, त्यांचे देहाचे प्रारब्ध संपले की त्यांचा देह जिथे सुटतो ती पुण्यभूमी बनून जाते. ज्ञानी पुरुष ज्या नदी किनारी, गुहेत, वृक्षाखाली तप करतो आणि जिथे त्याचा देह पडतो त्या क्षेत्रावर, तेथील पाणी, भूमी, अणुपरमाणुवर त्याच्या भाव उर्जेचा प्रभाव पडलेला असतो. त्या ऊर्जाभारीत क्षेत्रात कोणीही साधारण जीव जरी गेला तर त्या क्षेत्रात तयार झालेल्या आभामंडळामुळे त्याच्या चित्तात फार मोठा बदल होतो. वैराग्य वृद्धींगत होते. त्याच्यासाठी ते समाधी स्थान पुण्यक्षेत्रच असते.
पुण्य नदीचे तीर | तेथे पडावे शरीर | हा इतर जनाचा विचार | साधू नित्यमुक्त ||७/१०/१२||
अशा पुण्यक्षेत्री आपलाही देह पडला तर त्याचे सार्थक होईल सद्गती प्राप्त होईल असे सामान्य जीवाला वाटते. साधू मात्र नित्यमुक्त असतो.
आत अग्नी, बाहेर ज्योतीचा प्रकाश, दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायणाचे सहा महिने या उत्तम काळात ज्या ज्ञानी लोकांचा देह पडतो ते ब्रह्मापर्यंत जातात. आणि आत धूर असलेला अग्नी, बाहेर रात्र व अंधार, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने असा अधम काल आहे यात देह पडलेले योगी चंद्र लोकापर्यंत जाऊन परत येतात. आपल्याकडे शास्त्रात म्हटलंय की असा मृत्यू येणे फार उत्तम असतो. पण श्रीसमर्थ सांगत आहेत की हा सामान्य जनांच्या बुद्धीचा भ्रम आहे. ब्रह्मस्वरूप झालेल्या व काळाच्या पल्याड गेलेल्या साधुचा नव्हे. तो नि:संदेह असतो. असा ब्रह्मनिष्ठ ज्या काळी देह सोडतो तो पुण्यकालच असतो.