पुणे :पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आज सकाळी कोयत्याने एका तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान जखमी तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहिती नुसार हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला आहे. या हल्ल्यात सागर चव्हाण हा तरुण जखमी झाला आहे.
हल्ल्याचा मास्टर प्लॅन
आज पुण्यातील किरकटवाडी भागात सागर चव्हाण याला एका मित्राने बोलवून घेतलेले असताना त्याच्यावरच हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान त्याला भेटण्यासाठी आधी आरोपींनी मुलीच्या नावे एक फेक फेसबूक अकाऊंट बनवले होते. या अकाऊंट वर चॅटिंग करत त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आले.तर जखमी सागर चव्हाण याला मारण्यासाठी आरोपींनी एक अनोखा मास्टर प्लॅन तयार केला होता. यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने अकाउंट तयार केलं होतं. या अकाउंटवरून सागरला अनेक मेसेज देखील करण्यात आले होते.
आपल्याशी रोज बोलत असल्यामुळे सागर या अकाउंटच्या प्रेमात पडला होता. मात्र, हे अकाउंट आरोपी चालवत असल्याची कुठलीही कुणकुण त्याला लागली नव्हती. महिनाभर चॅटींग केल्यानंतर आज आपण भेटू असं सागरला सांगण्यात आलं. आज सकाळी सागर याला भेटायला बोलावले आणि त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला सुनियोजित कट होता.
मे महिन्यापासून या कटाची सुरूवात आहे. डहाणूकर कॉलनी मध्ये एकमेकांकडे खुन्नस देऊन पाहिल्यानंतर एकावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात श्रीनिवास वतसलवारचा खून झाला होता. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी एक सागर चव्हाण होता. आता या खूनाचा बदला घेण्याच्या ईर्ष्येने खूनाचा कट आखण्यात आला.
विद्येचे माहेरघर असलेली पुण्याची ओळख आता गुन्हेगारांचा अड्डा बनत चालली आहे का? की पुण्यात पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेचा धाकच या गुन्हेगारांमध्ये उरला नाहीये का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्याने विचारले जाऊ लागले आहे.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये मागील काही दिवसांतली ही चौथी हत्येची घटना आहे. पुण्यामध्ये भर रस्त्यात अशाप्रकारे होत असलेले जीवघेणे हल्ले चिंतेत भर टाकणारे आहेत. 'पुण्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही. गुन्हेगारांना कसलाही वचक राहिलेला नसून पुणे शहराची वाटचाल 'कल्चरल कॅपिटल' पासून 'क्राईम कॅपिटल'कडे झाली आहे. ' अशी पोस्ट X वर सुप्रिया सुळे यांनी केली आहे.