पुणे: “अण्णाभाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये साहित्याच्या माध्यमातून विविध गीते, पोवाडे, लावण्या, कादंबऱ्या यांचेलेखन केले आहे. अण्णाभाऊंचे साहित्य जगण्याची दिशा, मानवतावादाची भूमिका मांडते. अण्णाभाऊंच्या मानवतवादाची आज समाजाला गरज आहे. अण्णाभाऊंचे साहित्य समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्न झाले पाहिजे.
AI हे तंत्रज्ञान ही नव्या जगाचं देणं आहे. त्याचा सकारात्मक स्विकार करुन आपण महापुरुषांची चरित्र पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संजय कांबळे यांनी ‘चित्रमय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या पुस्तकाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना टिपल्या आहेत. हे पुस्तक अण्णाभाऊंचा इतिहास सांगते. अशा नवकार्यासाठी शासन मदत करीत आहे.” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.
कर्वे नगर परिसरात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ना. चंद्रकांत पाटील यांनी AI प्रतिमांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मुक्ता प्रकाशन आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजा माने आणि महाराष्ट्र शासनाचे अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त श्रीधर कांबळे यांनी समयोचित विचार व्यक्त केले.यावेळी डॉ. संदिप भुटाला, अतुल दीक्षित, सतीश झोंबाडे, मुक्ता प्रकाशनच्या संचालिका सविता कांबळे, स्नेहल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नामदार चंद्रकांत पाटील यांनी ‘चित्रमय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या पुस्तकाच्या प्रती फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहचवण्याचे जाहीर केले.या कार्यक्रमात त्यांनी पुस्तकाचे लेखक संजय कांबळे यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. यावेळी प्रास्ताविक वैभव चव्हाण आणि आभार प्रदर्शन महेश महामुनी यांनी केले.