पुणे : खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (८ जुलै) दुपारी १२.३० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग २७,२०३ क्युसेकवरून कमी करून १८,२७१ क्युसेक करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक घटली आहे. यामुळे जलसाठ्याचा विचार करून पाण्याच्या विसर्गात बदल करण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पुढील काळात पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये पुन्हा वाढ अथवा घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने विशेषतः मुठा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, नदीकाठच्या सखल भागात जाणे टाळावे तसेच नदीपात्रात असलेली जनावरे, वाहने, शेतीची अवजारे व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, नदीकाठच्या सखल वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या बदलाची माहिती देऊन आवश्यक ती दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. हवामानातील बदल आणि पावसाच्या परिस्थितीनुसार धरणातून होणाऱ्या विसर्गात वेळोवेळी बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही खडकवासला पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.